पुणे – घरी जात असलेल्या तरुणावर जुन्या वादातून गोळीबार करुन पळून गेलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (वय २३, रा. आंबेगाव), श्रेयश रुपेश काटे (वय २३, रा. धायरी फाटा), सुरज सुभाष डिंबळे (वय २३, रा. कल्याण), अतिष उमेश मोरे (वय २८, रा. आंबेगाव), ऋत्विक ऊर्फ दगडु पांडुरंग बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोर्णिमा रामदास माने (वय ४३, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, आंबेगाव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंद्रकांत रामदास माने (वय २१) याच्या दिशेने आरोपींनी गोळीबार केला होता. ही घटना ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री दीड वाजता घडली होती. चंद्रकांत माने हे जिन्यावरून चालत घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्यांनी आरोपीनी २ गोळ्या झाडल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींचा शोध घेतला जात होता. यावेळी तांत्रिक विश्लेषणात ते जांभुळवाडी येथील दख्खन हॉटेलचे रोडलगत थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन त्यांना पिस्टल व जिवंत काडतुसांसह पकडले. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांनी केली आहे़
