पिंपरी – देशाची सद्यस्थिती पाहता राजकारण्यांचे तरुणांच्या समस्यांकडे लक्ष नाही. शिक्षण क्षेत्रात अनागोंदी वाढली आहे. प्रवेशाबाबत अडचणी, नीट सारख्या परीक्षांचा घोळ या सर्व अडचणीतून शिक्षण घेऊन पुढे बेकारीचे संकट, बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे तरुण वर्ग नैराश्याच्या खाईत लोटला जात आहे हजारो तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. काही आत्महत्या करत आहेत. नैराश्य अवस्थेतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी संस्कारांची गरज आहे हे काम शिक्षकच करू शकतील असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी येथे केले.
मराठवाडा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या संस्थेच्या देवगिरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि मातोश्री प्राथमिक विद्यामंदिर ( चिखली) या शाळेतील शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, लक्ष्मण लिंबापुरे, संचालिका स्मिता जाधव, प्रीती शिंदे, पूजा जाधव, प्रिन्सिपॉल शहिदा सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी सातुर्डेकर म्हणाले की भारतीय संस्कृतीत कृतज्ञता महत्त्वाची आहे. आपल्या संस्कृतीत गुरूला मोठे स्थान आहे मातृदेवो भव,पितृ देवो भव,आचार्य देवो भव, असे म्हटले जाते. जीवनाची परिपक्वता म्हणजे शिक्षण असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. ही परिपक्वता शिष्यामध्ये येण्यासाठी जे कष्ट घेतात ते खऱ्या अर्थाने गुरु होत. आपल्याकडे ऋषीमुनींच्या काळात गुरुकुल पद्धती द्वारा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने झाला. मात्र कालानुरूप सगळे बदलले आहे. विद्यार्थी संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांची नावे सुद्धा शिक्षकांना आठवत नाहीत अशी परिस्थिती आहे. बऱ्याच घरात आई-वडील दोघेही नोकरीस असल्याने त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणूनच शिक्षकांकडे आशेने पाहिले जाते. आजही सर्वात प्रामाणिक घटक म्हणून शिक्षकालाच मान्यता आहे म्हणूनच साक्षरतेचे काम असो कुटुंब नियोजनाचा प्रसार असो की मतदार याद्यांचे काम असो मायबाप सरकारला शिक्षकच आठवतात मात्र शिक्षकेतर कामांचा बोजा शिक्षकांवर लादला जात असल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे, असे सातुर्डेकर म्हणाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुमार जाधव, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, संचालिका प्रीती शिंदे, प्रिन्सिपल शहिदा सय्यद, तसेच कीर्ती दुरुगकर, मालन गाडीलकर, वर्षाली चेंगे, सबीना सय्यद, आरती खोडसुरे या शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शीतल तुपे व तेजना गिरमे यांनी केले.
