पुणे – दहीहंडी उत्सवात आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांविरुद्ध पोलिसांकडून कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी शहर, उपनगरात दहीहंडी उत्सवात उच्च ध्वनिवर्धकांचा वापर करणाऱ्या ११०० मंडळाची तपासणी केली आहे. बिबवेवाडी भागात दहीहंडी उत्सवात आठ बास आणि आठ टाॅपचा वापर करणाऱ्या एका मंडळाच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहीहंडी, गणेशोत्सवात मंडळांनी ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास, तसेच चार टाॅपचा वापर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. शहरातील बहुतांश मंडळांनी सूचनांचे पालन केले. काही मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा वापर केला नाही. दहीहंडी उत्सवात ढोल-लेझीम पथके, तसेच पारंपारिक वाद्य पथकांना आमंत्रित करण्यात आले. काही मंडळांनी ध्वनिक्षेपक यंत्रणेत चार बास, चार टाॅपचा वापर केला. मात्र, आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. अशा मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.पोलिसांनी दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या शहर, तसेच उपनगरातील ११०० मंडळाची तपासणी केली. मंडळांनी वापरलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा, ध्वनीची तीव्रता याची तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी आवाजाची तीव्रता मोजली आहे. मंडळांनी चार बास आणि चार टाॅपचा वापर केला. मात्र, निर्धारित डेसिबलची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. तपासणी अहवालानंतर संबंधित मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे पोलिसांनी सांगितले.
