ब्रेकिंग न्यूज

पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत महापौर रवी लांडगे यांनी घेतली जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत शहराचे महापौर रवी लांडगे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली. मावळ मधील शेतकरी तसेच संबंधित घटकांच्या अडचणी व भूमिका विचारात घेऊन समन्वयातून सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढावा अशी सूचना त्यांनी केली. तसेच या विषयावरील पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन बैठक आयोजित करण्याचे नियोजन करावे असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हा प्रकल्प पुढे नेताना मावळमधील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. शहराची पाण्याची गरज आणि स्थानिक शेतकऱ्यांचे हित या दोन्ही बाबींमध्ये योग्य समन्वय साधून सर्वमान्य मार्ग काढण्याची भूमिका महापौरांनी मांडली.

यापूर्वी झालेल्या बैठकांमधील चर्चेच्या अनुषंगाने आता पुढील निर्णयप्रक्रियेला गती मिळणे गरजेचे आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच अन्य संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. यामुळे प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करून पुढील कार्यवाहीची निश्चित दिशा ठरविता येईल, असे सांगत महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याची विनंती केली.

याबाबत बोलताना रवी लांडगे म्हणाले, “पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचवेळी मावळमधील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षांचाही संवेदनशीलतेने विचार होणे आवश्यक आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर पुढील बैठक आयोजित करून विषयाला गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे”