मुंबई – सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर झाल्यास तातडीने ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावरील सायबर जनजागृती चित्रपट ‘ऑपरेशन 1930’ चा ट्रेलर आणि ‘1930 सायबर अँथम’चे अनावरण करण्यात आले.
सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता, सायबर फसवणूक झाल्यास तातडीने ‘1930’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सायबर फसवणुकीनंतरचा ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र, नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यास 3 ते 15 दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून वळविले जातात आणि त्यांची रिकव्हरी अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता 1930 या क्रमांकावर संपर्क साधणे आवश्यक आहे.
मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
सायबर गुन्हेगारांकडून ‘पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे’, ‘ओटीपी फ्रॉड’, ‘बनावट फोन कॉल’, ‘पोलीस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे’ अशा विविध क्लृप्त्यांचा वापर केला जातो. स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती, पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीशांचे रूप पाहून सामान्य नागरिक घाबरून जातो आणि त्यातून फसवणुकीला बळी पडतो. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय असून, कलाकार, अभिनेते आणि गायकांच्या माध्यमातून हा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो. ‘डिजिटल अरेस्ट’ या 42 मिनिटांच्या जनजागृती चित्रपटासह विविध क्लिप्स आणि रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्यापक अभियान राबवून हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक तसेच बनावट ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय असून, भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने व्यापक सायबर जनजागृती मोहीम यशस्वी होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महा सायबर’चे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेते शरद केळकर, जावेद जाफरी, सिनेकलाकार आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, समय रैना, गायिका सुनिधी चौहान, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
